Monday 30 March 2015



 इंसान का इंसान से हो भाईचारा; यही पैगाम हमारा, यही पैगाम हमारा.. या दिव्य पंक्ती उच्चारत दिल्लीकरांच्या काळजात हात घालणार्‍या आम आदमी पक्षात सध्या ‘भाईचार्‍या’ची जागा ‘भाईगिरी‘ने घेतली आहे. लोकशाही मूल्यांसाठी स्थापन झालेल्या या पावसाळी छत्रीसम पक्षात लोकशाहीला काळीमा फासण्याची जणू चढाओढ लागली आहे. या पावसाळी छत्र्यांप्रमाणे उगवणार्‍या पक्षांची अशी वाताहत होण्याची कारणे म्हणजे त्यांच्यातील सामाजिक निष्ठेचा अभाव! त्यांचा ‘आप’मतलबीपणा!
दिल्लीतील आम आदमी पक्षात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला ‘आप’मतलबीपणा आता लाथा-बुक्क्यांवर येऊन ठेपला आहे. आम आदमी पक्षात चाणक्यीय थाटात वावरणारे योगेंद्र यादव आणि कायदेआझम समजणारे प्रशांत भूषण यांना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून अखेर लाथा बुक्क्या खाऊन बाहेर पडावे लागेल. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांना मज्जाव करण्यात आला. त्यामुळे लोकशाही तत्त्वांचा आपल्या सोयीने वापर करण्यात पटाईत असलेले यादव बैठकस्थळाच्या बाहेरच ठिय्या मांडून बसले. त्यानंतर झाली तेवढी शोभा पुरे म्हणत पक्षाने त्यांना बैठकीत प्रवेश दिला. भूषण यांना या बैठकीला हजर राहण्यास मज्जाव करण्यात आला नव्हता. त्यामुळे ते तेथे उपस्थित होते.
या दरम्यान केजरीवाल समर्थकांनी यादव आणि भूषण यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. याचदरम्यान ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शांति भूषण यांच्या अंगावरही काही कार्यकर्ते धावल्याचा आरोप होत आहे. हा सर्वप्रकार केजरीवाल निवांतपणे पाहत होते. या सर्व प्रकारानंतर केजरीवालांनी, ''मै सभी पदो का इस्तिफा देता हू'' ही आपली रेकॉर्डींग वाजवून सभा स्थळाहून काढता पाय घेतला. त्यानंतर बैठकीची सुत्रे गोपाल राय यांनी हाती घेतली. नियोजनाप्रमाणे चार बंडखोर नेत्यांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी मतदान घेऊन निलंबीत करण्यात आले. यामध्ये योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, अजित झा, प्रा. आनंद कुमार यांचा समावेश आहे. या सर्व प्रकारानंतर  मेधा पाटकर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. खरंतर  मेधाताई या पक्षात किती कृतीशील होत्या हा प्रश्नच आहे. आपमधील राड्याला मिळणाऱ्या राष्ट्रीय मीडिया कव्हरेजचा अंदाज घेवून त्यांनी 'आप'ला राजीनामा दिला असावा. तशा त्याबाबतीत त्या माहीर आहेत.

 




          वास्तविक पाहता एका विशिष्ट प्रकारच्या ध्येयासाठी स्थापन झालेल्या पक्षात फूट पडणे हा काही नवा प्रकार नाही. यापूर्वी जयप्रकाश नारायण यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातूनच जनता पार्टीचा जन्म झाला होता. इंदिरा गांधींच्या भ्रष्टाचारी, हुकुमशाही राजवटीला कंटाळून एका बुजुर्ग नेत्याच्या नेतृत्त्वाखाली देशातील काही प्रामाणिक नेत्यांसह अनेक स्वार्थी व भ्रष्टाचारी नेते एकवटले आणि जनता पार्टी सत्तेत आली. या पार्टीचा इतिहास पाहता आजच्या आम आदमी पार्टीशी ती बरोबर मेळ खाते. त्याकाळी लालूप्रसाद यादव, शरद यादव यांसारखे नेते पुढे आले. विशेष म्हणजे, शांति भूषण हे त्या सरकारमध्ये होते. आजही ते केजरीवालांच्या पक्षाशी संबंधित आहेत.
        जनता सरकारमधील नेत्यांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा पराकोटीला गेली आणि त्यातून पक्षाला उतरती कळा लागली. आम आदमी पक्षाच्या बाबतीतही तेच घडत आहे. इतिहासाची पाने चाळता, आपल्याकडे अशाप्रकारे अनुभव असूनही भारतीय नागरीक तीच चूक पुन्हा पुन्हा करतात. याचे कारण म्हणजे, देशातील पढतमुर्खतेची पुनरावृत्ती आणि एखाद्या अवतारी पुरूषाची वाट पाहण्याची वृत्ती. मग हा अवतारीपुरूष कधी जयप्रकाशजींच्या रूपाने, कधी मोदींच्या रूपाने तर केजरीवालांच्या रूपात त्यांना दिसतो.
या सर्व प्रक्रियेत सत्तेचं विकेंद्रीकरण होत असलं तरी, मुख्य समस्येवर मात्र इलाज होत नाही. जनता पार्टीला लोकांनी निवडून दिले होते. तरीही ते सरकार चालविण्यास, भ्रष्टाचार, महागाई कमी करण्यास सपशेल  नालायक ठरले होते. जनता पार्टीच्या ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’, ‘महागाईमुक्त भारत’ या तात्कालीक प्रेरणेच्या प्रयोगामुळे त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम राष्ट्राला भोगावे लागले. कारण त्यानंतर पुढची अनेक वर्षे देशाच्या केंद्रीय राजकारणात कॉंग्रेसचा अंमल राहिला. जनता पक्षाच्या फसलेल्या प्रयोगामुळे भारतीयांची मतदानाबाबतची नकारात्मक मानसिकता तयार झाल्याचं पाहायलं मिळतं. नकारात्मक मानसिकतेमुळे लोकशाहीतील सत्तेच्या विकेंद्रीकरणाची प्रक्रिया मंदावली. ती इतकी मंदावली की, थेट 1999 सालीच देशात खर्‍याअर्थी सत्तांतर झाले. आम आदमी पक्षाच्यारूपाने आजही त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. मात्र ही पुनरावृत्ती मजबूत लोकशाहीसाठी घातक आहे.

 
या प्रकारच्या प्रयोगात नैतिकतेचा टेंबा मिरवणारे अनेक नेते येतात. मसीहा येण्याच्या दिशेने आशाळभूत नजरा लावून बसलेल्या जनतेला ‘आप’ली स्वप्ने विकतात आणि इतिहासाच्या पानात कंलकित होऊन राहतात. जनता मात्र पुन्हा एकदा नवा मसीहा येण्याच्या खोट्या आशेवर  राहते. जनता पार्टी, आम आदमी पार्टी या नामसंकल्पनासाधर्म्य असलेल्या संघटना फुटण्यामागे एकच कारण असते, ते म्हणजे व्यक्तिगत प्रतिमा उंचावून लोकशाहीरूपी हुकुमशहा बनण्याची. केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाची आजची स्थिती पाहून गीतकार जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेल्या आणि सुधीर फडके यांनी गायलेल्या एका गाण्याच्या ओळी आठवतात...
स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी
‘आप‘लीच प्रतिमा होते ‘आप’लीच वैरी
घडोघडी आपराधांचा तोल सावरावा...

सागर सुरवसे,
उपसंपादक, 'चपराक', पुणे 
९७६९ १७९ ८२३ /  ९६६५ ८९९ ८२३
Follow On Twitter: @sagarsuravase
 

0 comments:

Post a Comment

Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!