Friday, 18 January 2013

                    क्रिकेट विश्वातील महात्मा !              
महानगरातील सच्चू ! शहरातील तेंडल्या तर ग्रामीण भागातील सच्या हा नामजप गेली तेवीस वर्षे क्रिकेट क्षेत्रात चर्चेच्या अग्रस्थानी राहिलेला आहे. देशातच नव्हे तर परदेशातही त्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कदचित महात्मा गांधी यांच्यानंतर परदेशी लोकांचे प्रेम मिळविणारा हा एकमेव भारतीय, एकमेव खेळाडू असेल !
'स्व'विचार न केल्याने पूर्वी भारताने आपले स्वातंत्र्य गमावले होते. आजही तो विचार  'न' जपल्यामुळे आपण आपली चांगली माणसेही गमावतो आहोत. कणभर लोकांचे विचार मणभर माणसे ऐकतात  व तेच अंतिम  सत्य मानतात.  ही वैचारिक  अंधश्रद्धेची मूळ वेळीच उपटून काढली पाहिजे. एकविसाव्या युगातील भारतीयांकडून ही परंपरा पाळली जात आहे, याचेच शल्य वाटते !
  
कोणत्याही टिकेने, कृतिने आपला खेलावरचा संयम न सोडता आपली भूमिका तटस्थपणे  निभावणारा व त्यायोगे विरोधकांना कृतिपूर्ण उत्तर देणारा हा क्रिकेट विश्वातील महात्मा गांधीच ठरतो. 
१९८९ मध्ये सोळा वर्षाच्या या मुंबईतील मराठी युवकाने  अथक परिश्रमाने आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमध्ये खेळण्यास स्वतःला पात्र केले. तेवीस वर्षात ४६३ सामने खेळून १८४२६ धावा करणारा क्रिकेट जगतातील कदाचित तो एकमेव खेळाडू ठरावा. 
गेल्या दीड वर्षापासून सचिनच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित केली जाऊ लागली. ( अर्थात ती जाणीवपूर्वक ) एखाद्या मुर्खाने , अनुभवशून्य व्यक्तिने ती केली असती तर समजण्यासारखे होते. मात्र सुनील गावसकर कपिल देव आदी दिग्गजांनीही शंका त्याच्या क्षमतेवर शंका उपस्थित करणे दुर्दैवी होते. ' मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो ' हे दुर्दैवाने  पुन्हा एकदा  सिद्ध झाले. हे बदनामीचे, खच्चीकरणाचे जाळे विनायचे काम कोणी केले हा विषय वेगळा; मात्र तेंडल्याच्या बाबतीत सामान्य जनतेने, त्याच्या चाहत्यांनी या टीकेला, फुकटच्या सल्ल्याला योग्य मानून सचिनवर आगपाखड केली व आपला करंटेपणा पुन्हा एकदा दाखवून दिला. 
भारतीय जनता किती दुधखुळी आहे याची उदाहरणे ऐकली होती. आता लक्षात येत आहे . सचिनने एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती का घेतली ?  यावर वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. काय तर म्हणे पाकिस्थानच्या खेळाडूंना घाबरून त्याने निवृत्ती घेतली. काही महाभाग म्हणताहेत की, दिल्लीतील बलात्काराच्या प्रकरणावरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी त्याला कॉंग्रेसने  राजीनामा द्यायला लावला. इतकी वैचारिक अंधश्रद्धा आजही आपल्या देशात आहे. ( काय तर म्हणे २०२० ला भारत महासत्ता होणार ! )
दरम्यान भारतीय माध्यमांनीदेखील सचिनच्या बाजूने ठामपणे भूमिका घेतली नाही. चार - पाच वर्षे क्रिकेट खेळलेल्या उपटसुम्भाने  केलेल्या टिपण्णीलाही माध्यमांनी सवंगपणे प्रसिद्धी दिली. मुळात अशा प्रकारच्या जागतिक कीर्तीच्या खेळाडू, साहित्यिक, कलावंत यांच्याबाबत अशा किरकोळ टीकेला कितपत प्रसिद्धी द्यावी याचा विचार होणे गरजेचे आहे . 
सचिनने भारताचे नाव क्रिकेट विश्वात जगभरात आघाडीवर आणले.' क्रिकेट विश्वातील कोहिनूर हिरा ', ''क्रिकेटचा देव' 'बादशहा', 'शहेनशहा' आदी उपाद्या  साऱ्या जगाने त्याला दिल्या. सचिनच्या यशाची धास्ती घेतलेल्या लोकांनी सचिनला टारगेट केले. ते नैसर्गिकच  होते. 
पूर्वी क्रिकेटच्या सामन्यात एखादा स्ट्रोक, एखादा  पंच मारल्यानंतर संपूर्ण हाताला मुंग्या येत. हातातून ब्याट केव्हा खाली पडेल याची शाश्वती नसायची. मात्र तरीही निकृष्ठ दर्ज्याच्या ब्याटद्वारे त्याने आपली क्रिकेटची वाटचाल सुरु केली. नुसती सुरूच नव्हे तर नेत्रदीपकही बनवली. कदाचित त्यामुळेच त्याला खांद्याची शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. 
 हत्तीसारखे बलाढ्य खेळाडू समोर गोलंदाजी करत असतानादेखील त्याने संघातील आपले स्थान टिकवून ठेवले. ज्या देशाने आपल्या राष्ट्रावर १५० वर्षे राज्य केले , त्यांनीच निर्माण केलेल्या खेळावर सचिनने गेली २३ वर्षे अधिराज्य गाजवले. त्याचे हे योगदान भारतीयांनी लक्षात घ्यायला हवे होते. भारत हि बुद्धिवंतांची भूमी आहे. त्याचप्रमाणे आज- काल ती मुर्खांचीही भूमी ठरत आहे. 'स्व'विचार न केल्याने पूर्वी भारताने आपले स्वातंत्र्य गमावले होते. आजही तो विचार  'न' जपल्यामुळे आपण आपली चांगली माणसेही गमावतो आहोत. कणभर लोकांचे विचार मणभर माणसे ऐकतात  व तेच अंतिम सत्य मानतात. ही वैचारिक अंधश्रद्धेची मूळ वेळीच उपटून काढली पाहिजे. एकविसाव्या युगातील भारतीयांकडून ही परंपरा पाळली जात आहे, याचेच शल्य वाटते !  
                                                           ( प्रकाशित लेख - साप्ताहिक 'चपराक', दि. ३१ डिसेंबर २०१२ )   
                                                       सागर सुरवसे, पुणे. 
                                 भ्रमणध्वनी - ९६ ६५ ८९९ ८२३ email : vijaypath150@gmail .com  

Thursday, 2 August 2012

   राजकारण,  पुण्याचे आणि पाण्याचे
 
'पाणी म्हणजे जीवन' हा मौलिक संदेश रस्त्यावरील फालकांपासून ते शाळेतील वर्गामध्ये आपण आपल्या लहानपणापासून वाचत आलो आहोत. थोर विचारवंतांच्या व्याख्यानापासून  ते ह.भ.प बुवांच्या कीर्तनापर्यंत या विषयावर सातत्याने प्रबोधन घडत असते.मात्र या संदेशाकडे दुर्लक्ष्य केल्याने परिस्थिती जैसे थे !
                       राजकीय नेते तर या संदेशाचे 'Brand अम्बेसादोर' आहेत. हिवाळ्याच्या समाप्तीपासून ते पावसाला सुरु होईपर्यंत त्यांच्या एकाही भाषणाची सुरवात किंवा शेवट  'पाणी म्हणजे जीवन' या संदेशाशिवाय होत नाही.
         'याचकाला दान देणे' असे आपली भारतीय संस्कृती सांगते.मात्र पुण्याचे खासदार आणि हिंदू संस्कृतीचे ठेकेदार असणारे सेना-भाजप  यांना हे तत्त्व मान्य नाही. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दौंडला पाणी देण्याची घोषणा केल्यानेच कॉंग्रेस, भाजप, आणि दोन्ही सेनांनी दौंडला पाणी देण्यास विरोध केला आहे. कारण आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी प्रचाराला आणखी एक मुद्दा मिळाला, अशी त्यांची  भावना. शिवाय एखाद्या निषेधाच्या कागदावर सह्या करून विरोध करायला कुणाचे काय जाते? तेवढेच वृत्तपत्रात नावही छापून येते.
         वास्तविकतः परिस्थिती अशी आहे की, जेव्हा पुण्यातील धरणं बांधायची ठरली तेव्हा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या तेव्हा त्यातील काही शेतकऱ्यांचे पुनर्वसन दौंड परिसरात करण्यात आले होते. कोणत्याही प्रकारची जास्तीची अपेक्षा न बाळगता त्यांच्या एका पिढीने त्याग केला. आता त्यागाची पाळी पुणेकरांवर आहे. ती त्यांनी विनासायास  स्वीकारणे नैतिकतेला धरून होईल. 
         आजमितीला पुणे शहरातील चार धरणात मिळून दोन टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पुणेकरांकडून दरमहा एक टीएमसी पाणी वापरले जाते. म्हणजे पुढील दोन महिने पाऊस पडला नाही तरी पुण्याला पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. जर का एक पाण्याची पातळी एक टीएमसीच्या खाली गेली तरच पुण्यात पाणीकपात केली जाईल. ही     वस्तुस्थिती माहिती असताना देखील  विरोधकांनी असा कांगावा करणे म्हणजे शहाजोगपणाचे ठरत आहे.
           संकटसमयी एखाद्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा त्यावर  निर्णय घेणे याला व्यवस्था- पन शास्त्रात मोठे महत्व आहे. पुढे तो निर्णय बरोबर की चुकीचा याची प्रचिती भविष्यातील परिणामातून दिसून येतेच. त्यामुळे पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय सध्यातरी योग्यच आहे.
          ही झाली पुण्याच्या राजकीय परिस्थितीची एक बाजू. त्याची दुसरी बाजू पाहणेही महत्वाचे आहे. दौंडप्रमाणेच आळंदीतही पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. आळंदीला पाणी मिळावे यासाठी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे मागणी करण्यात आली होती. मात्र ती मागणी फेटाळत पिंपरी पालिकेने पाणी देण्यास नकार दिला. 
                     'जो जे वांछील तो ते लाहो' अशी वैश्विक प्रार्थना करणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीला पाणी न देण्याचा करंटेपणाही राष्ट्रवादीने केला आहे. त्यामुळे दौंडकरांना पाणी दिल्याने त्यांचे पाप धुऊन निघेल अशातला भाग नाही शिवाय आळंदी नगरपालिका आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची सत्ता असल्यानेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने त्यांना पाणी नाकारल्याचे आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आले आहेत. 
                 दौंडची सत्ता राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांना पाणी देण्याचा निर्णय दादांनी झटक्यात घेतला. याशिवाय दौंड परिसरात राष्ट्रवादीच्या नेत्यांचे खाजगी साखर कारखाने असल्याने तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पीक वेळेत येण्याचीही काळजी घेतली जात असल्याचे पुण्याच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 
                  राजकारणात शह-काटशह हे ठरलेलेच असतात. मात्र यात बळी जातो तो विकासकामांचा, नागरी सुविधांचा, महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वेळेचा. त्यामुळे राज्याचा गाडा हाकताना समतोल आणि सर्वांगिण विकास यालाच प्राधान्य दिले गेले पाहिजे. अन्यथा सत्तेच्याअस्थिरतेची तलवार सातत्याने डोक्यावर लटकत राहणार यात शंका नाही. 
                                                                                                          सागर सुरवसे, पुणे     भ्रमणध्वनी : ९६६५ ८९९ ८२३   

Saturday, 7 January 2012


...अन्यथा पत्रकारिता 'दीन' होईल'
"वृत्तपत्रे  हे जनजागृतीचे आणि क्रांतीचे एक बलाढ्य साधन आहे. हीच गोष्ट आजपर्यंतच्या मराठी वृत्तपात्रांनी दाखवून दिली आहे. त्यागाची नि पराक्रमाची तेजस्वी परंपरा पुढे चालविण्यासाठी कडव्या ध्येयवादी पत्रकाराची आज महाराष्ट्राला अतिशय जरुरी आहे.पत्रव्यवसाय हा जरी धंदा असला, तरी पत्रकाराची वृत्ती मात्र एक महान धर्म आहे. धंद्याला धर्माचे स्वरूप द्यावे, पण धर्माचा मात्र धंदा करू नये. जनजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांती व्हावी म्हणून पत्रकाराच्या लेखणीमधून क्रांतिरसाच्या चिळकांड्या उडाव्या आणि वृत्तपत्रे ही क्रांतिरसाची कारंजी व्हावीत. जनता क्रांतीचा जयजयकार करणे हाच पत्रकाराचा खरा धर्म आहे. "  - आचार्य अत्रे .
           पत्रकारिता म्हणजे लोकशाहिचा चौथा आधार स्तंभ . जो न दिसणारा मात्र परिणाम साधणारा आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळ असो वा गोवा मुक्तीसंग्राम असो, सदैव अग्रस्थानी राहून सामाजिक व राजकीय न्याय मिळवून दिल्यानेच कि काय? ती लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ बनली आहे. पत्रकारिता ही समुद्राच्या तळापेक्षाही खोल आहे. समुद्राचा तळ एकवेळ आपल्याला सापडेल मात्र पत्रकारिता आपल्याला सापडणार नाही. तिला सुरवात आहे परंतु अंत नाही. रोज नवी आव्हाने, रोज नव्या कल्पना घेवून पत्रकारितेची सकाळ होते. आणि सुख -दुख देवून तिची संध्याकाळ होते. दुरून ती सूर्याप्रमाणे देदीप्यमान दिसते. जर तिच्या  जवळ गेलात की ती व्यक्तिगत आयुष्याला,अस्तित्वाला जाळून टाकते. अनेक हवशे -नवशे तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र एक झळ लागली की ते दूर निघून जातात.
                                       पत्रकारीते बाबतीत एक म्हण नेहमी सांगितली जाते, 'घरचं खावून ;लष्कराच्या भाकऱ्या  भाजणे म्हणजे पत्रकारिता'.   लोकमान्य टिळक ,                             श्री. आगरकर,आचार्य अत्रे,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदि मंडळींनी जर का ह्या लष्कराच्या भाकऱ्या भाजल्या नसत्या तर आज आपण स्वाभिमानाची भाकरीदेखील खाल्ली नसती. स्वामी विवेकानंदानाही पत्रव्यवसायाचा मोह आवरला नाही. शिकागोमध्ये असताना त्यांनी आपल्या शिष्यांना पत्राद्वारे सूचना केली, की "एक मासिक पत्रिका प्रकाशित करा".
     पूर्वी पत्रकारिता धर्माला प्रथम स्थान तर व्यवसायाला दुय्यम स्थान होते. विश्वनियमाप्रमाणे  काळ बदलत गेला. आयते स्वातंत्र मिळालेल्या पिढीने व्यवसायाला प्राधान्य तर  धर्माला दुय्यम स्थान दिले. सहाजिकच त्यामुळे आपापसातील हितसंबंध वाढत गेले. आज त्याने त्याची परिसीमा गाठली आहे. जर का एखाद्या व्यावसायिकाने जाहिरात दिली की त्याच्या विरोधात बातमी छापायची नाही. त्या उलट जाहिरात नाही दिली तर बातमी छापायची. आतातर नवीन प्रकार पाहायला मिळतो आहे की, एकाद्याने दुसऱ्या वृत्तपत्रात जाहिरात दिली व आपल्याला दिली नाही तर त्याच्या विरोधात बातमी छापायची.हा प्रकार वाढत आहे. बातमी बरोबरच जाहिरात हा वृत्तपत्राचा आत्मा आहे. यापैकी कोण एकाला मारलं तरी जीव मात्र पत्रकारीतेचाच जाणार आहे. पत्रकारितेची विश्वासार्हता टिकवणे महत्वाचे आहे. वृत्तवाहिन्यांच्या तुलनेत मुद्रित माध्यमांनी (प्रिंट मिडियाने ) त्यांची विश्वासार्हता बऱ्यापैकी टिकवून ठेवली आहे. परंतु येणारी पीढी ती कितपत टिकवून ठेवू शकते हे सांगणे कठीण आहे. 
 आजच्या आम्हा तरुण पिढीतील पत्रकारांना मुळात पत्रकारिता म्हणजे काय? हेच काळात नाही. पत्रकारिता म्हणजे  स.१० ते रात्री ८ ची ड्यूटी अशीच त्यांची कल्पना आहे.                                        
                    आज विविध वृत्तपत्रविद्या शिकविणाऱ्या संस्थामधून विद्यार्थ्यानमध्ये आपली विचारधारा रुजविण्याचे काम शिस्तबद्ध पद्धतीने चालू आहे. आणि हीच गोष्ट समाजासाठी घातक ठरत आहे. किंबहुना पत्रकारितेच्या विश्वासार्हतेसाठीही.     जे चूक ते चूक आणि जे बरोबर ते बरोबर अशीच वृत्तपत्रांची भूमिका असावी. मात्र काही विशिष्ठ विचारधारेच्या कंपूने ही भूमिका बदलवली आहे. पत्रकाराची इच्छा नसतानाही मालकशाहीमुळे त्यांना त्यांची लेखणी गहान टाकावी लागत आहे. 
       लोकमान्य टिळक म्हणतात,"गुळगुळीत कागदावर बुळबुळीत अग्रलेख  लिहिणे म्हणजे पत्रकारिता नव्हे". जर का आजच्या पत्रकारांनी आपली   व्यक्तिगत   विचारधारा समाजावर न लादता चतुरस्त्र,परखड,रस्ता व कर्तव्यदक्ष या चतु:र्सुत्रीप्रमाणे कार्यरत राहिले तर आणि तरच पत्रकारितेची विश्वासार्हता टिकून राहील. अन्यथा पत्रकारिता 'दीन' होईल.             
                                                                                                             -सागर सुरवसे , ९६६५८९९८२३ 
   समाजात आपल्या आजुबाजूला दररोज अनेक चांगल्या-वाईट घटना घडत असतात. त्याच्या वयोमानानुसार प्रतिक्रियाही उमटतात. मात्र आपण ती गोष्ट सर्वांसोबत 'शेयर' करू शकत नाही. कारण आपल्याकडे माध्यम नाही. ही उणीव लक्षात घेवूनच मी हा ब्लॉग चालू केला आहे.
      या ब्लॉगमध्ये प्रकाशित होणाऱ्या सर्वच लेखांशी, बातम्यांशी आपण सहमत असालच असे नाही. मात्र त्यावरील आपली प्रतिक्रिया जरूर कळवावी; चांगली- वाईट  कोणतीही. कारण ते जिवंतपणाचे लक्षण असते. या ब्लॉगमध्ये  कोणत्याही एकांगी विचारधारेचा समावेश नसणार आहे. राष्ट्रीय हितासाठी जे चांगले त्याचे सदैव स्वागत असणार आहे . कोणत्याही पक्षाशी आपण बांधील  असणार नाही . जे चांगले ते चांगले, जे वाईट ते वाईट हीच भूमिका असणार आहे. आपणही आपले विचार, लेख, बातम्या पाठवू शकता. त्याचे सदैव स्वागत राहील. त्यासाठी vijaypath150@gmail .com या ईमेल आयडी वर मेल पाठवा. सोबत फोटो असेल तर तो ही पाठवा.

                                                                                                       आपला मित्र ,
                                                                                                        सागर सुरवसे 
                                                                                                     ९७६९१७९८२३/ ९६६५८९९८२३ 
Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!